एक दुर्लक्षित राजा

Posted by Vinay Yadav On

एक दुर्लक्षित राजा

मराठी मुलखात महाराज म्हटलं की एकच नाव आपसूक डोळ्यासमोर येतं, शिवाजी महाराजांचं. दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य उभं करणाऱ्या या रयतेच्या राजानंतर आणखी एका मराठी राजानं तलवार गाजवत स्वत:चं हक्काचं राज्य मिळवलं आणि वाढवलंही. त्याचा राज्याभिषेकही झाला होता... पण त्याचं नाव मात्र फारसं घेतलं जात नाही. कारण इतिहास सोयीनं लिहिला जातो आणि इतिहासातली माणसंही सोयीनंच लोकप्रिय केली जातात. यशवंतराव होळकर हे असंच एक उपेक्षित नाव. आज ६ जानेवारीला त्यांच्या राज्याभिषेकाला २१२ वर्षे पूर्ण होताहेत.

तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी यशवंतरावांना अनौरस ठरवत त्यांचा होळकरी गादीवरचा अधिकार नाकारला. संस्थानाची जबाबदारी डंडरनेक या फ्रेंच अधिकाऱ्यावर सोपवली. या अन्यायाविरुद्ध तरुण यशवंतरावांनी पेंढारी आणि भिल्लांचं सैन्य जमवलं. डंडरनेकचा पराभव करीत १७९८मध्ये राज्य परत मिळवलंच वर पुढच्याच वषीर् महेश्वर इथं वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. यशवंतरावांचा भाऊ तुकोजीला पुण्यात हत्तीच्या पायी दिल्यानंतर यशवंतरावांनी पुण्यावर चाल करून शिंदे आणि पेशव्यांची इतकी दाणादाण उडवली की दुसरा बाजीराव शनिवारवाडा सोडून पळून गेला.

शिवाजी महाराजांनंतर इंग्रजांचा धोका ओळखलेला हा दूरदशीर् राजा होता. इंग्रजांविरुद्ध त्यांनी तब्बल १८ युद्धं केली. एकाही युद्धात इंग्रज जिंकू शकले नाही. भरतपूरचं युद्ध तब्बल तीन महिने चाललं, जिंकले ते यशवंतरावच. १८०३मध्ये यशवंतरावांनी इंग्रजांविरुद्ध संपूर्ण लढा पुकारत इंग्रजांना इतकं जेरीस आणलं की त्यांनी शांततेसाठी विनवण्या केल्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांनी शांततेचा प्रस्ताव पुढे केलेला हा एकमेव राजा होता. भानपुरा इथं त्यांनी अद्ययावत तोफांचा कारखाना काढला. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय होतं कलकत्त्यात. इंग्रजांना नेस्तनाबूत करायचं तर सगळ्यांनी एकत्र लढायला हवं, हेही यशवंतरावांना नीट उमगलं होतं. त्यांनी त्यावेळच्या राज्यर्कत्यांना पत्रं पाठवून तशी आर्जवंही केली. पण त्यांच्यामागे उभे राहण्याऐवजी ही पत्रं इंग्रजांकडे पोहचवण्याचे पराक्रम इथल्या राजांनी केेले. या बहाद्दर राजानं थेट कलकत्त्यावर हल्ला करत साहेबाच्या घरात जाऊन त्याची मानगूट पकडण्याची योजना आखली होती. भिल्ल-पेंढाऱ्यांच्या सैन्यानिशी अफाट पराक्रम गाजवणाऱ्या या राजाच्या आयुष्याची दोरी मात्र बळकट नव्हती. अवघ्या पस्तिसाव्या वषीर् हे वादळ थंडावलं.

यशवंतरावांचं राज्य माळव्यात. पण त्यांचा जन्म मराठी मुलखातला. राजगुरूनगर जवळ वाफगावचा. तिथं आठ एकर जागेवर होळकरांचा वाडा आहे. होळकरांनी तो रयत शिक्षण संस्थेला देणगीरूपात दिलाय. तिथं आता शाळा भरते. आजही हे बांधकाम मजबूत आणि सुुस्थितीत आहे. त्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी होतेय. याच वाड्यात आज यशवंतरावांच्या राज्याभिषेकाच्या स्मृती जागवल्या जाणार आहेत. महादेव जानकर आणि मंडळी एकत्र येऊन यशवंतरांचा इतिहास जागता ठेव-ण्याचा प्रयत्न करताहेत. गरज आहे ती इतिहासाच्या पानात जाणीवपूर्वक दडपलं गेलेलं यशवंतराव नावाचं लखलखतं पान लोकांपर्यंत जाण्याची.